सातारा : कराड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंढे (ता. कराड) गावात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हे नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना मुंढे येथील 'सह्याद्री रेसिडेन्सी' या इमारतीत बिनधोकपणे राहत होते. विशेष म्हणजे कराड शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात हे घुसखोर वास्तव्यास असूनही कोणालाही याची खबर नव्हती. शनिवारी, दि. २० फेब्रुवारी रोजी कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हे सर्व संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर (जि. कालिया, नोडाईल) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते मुंडे या गावात कसे आले ? त्यांना येथे कोणी आश्रय दिला ? याबाबत पोलीस कसून तपास करत असून या बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments